सासरच्यांकडून सतत टोमणे मारून मानसिक छळ:धनकवडीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, नणंदेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धनकवडी परिसरात एका दुर्दैवी घटनेत ३५ वर्षीय विवाहिता वर्षा तुकाराम रणदिवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सतत छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. व्यंकटेश अपार्टमेंटसमोर, गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी येथे राहणाऱ्या वर्षा यांनी २४ मे रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी मृत महिलेचे पती तुकाराम रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये उज्ज्वला बागाव (५०), तिचा मुलगा योगेश (३५), मुली वैशाली (३२) आणि सुवर्णा (२५) यांचा समावेश आहे. उज्ज्वला ही फिर्यादी तुकाराम रणदिवे यांची बहीण असून, दोन्ही कुटुंबे शेजारी राहतात. या चौघांनी वर्षा यांना सतत टोमणे मारून त्यांचा मानसिक छळ केला. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली होती. मात्र तुकाराम रणदिवे यांनी नंतर केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात छळामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक एस पवार पुढील तपास करत आहेत. बाह्यवळण मार्गावर प्रवासी तरुणाची लूटमार कोल्हापूरला निघालेल्या प्रवासी तरुणाला मारहाण करुन लुटण्यात आल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली. प्रवासी तरुणाकडील सोनसाखळी, मोबाइल , रोकड असा ३५ हजारांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले.याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरुणाला कोल्हापूरला सोडतो, असे सांगितले. तरुण मोटारीत बसला. त्यानंतर चोरट्यांनी मोटार बाह्यवळण मार्गावरुन खेड शिवापूरकडे नेली. प्रवासादरम्यान चोरट्यांनी तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील दोन हजारांची रोकड, मोबाइल , सोनसाखळी असा मुद्देमाल लुटला.

What's Your Reaction?






