रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला?:पालकमंत्रिपद म्हणजे सर्वस्व नाही, आदिती तटकरेंचे सूचक विधान, शहांनी दिल्या होत्या सूचना
राज्यात रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील शीतयुद्ध निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सलग दुसऱ्या दिल्ली दौऱ्यात यावर महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या असून, रायगडच्या पालक मंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं आहेत. तर रायगडचे पालकमंत्रिपद म्हणजे सर्वस्व नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. यामुळे आता महायुतीमधील सुटणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत महायुतीतील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यात रायगडच्या पालक मंत्रिपदाच्या वादाचाही समावेश होता. शहा यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडवावा, अशा सूचना केल्या. या सूचनेनंतर एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट रोजी नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण होणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे हे पद शिंदे गटाकडे जाते की अजित पवार गटाकडे, हे लवकरच स्पष्ट होईल. पालकमंत्रिपदासाठी भाजपही शर्यतीत रायगडच्या पालक मंत्रिपदावरून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या वादाला आता भाजप नेते पंडित पाटील यांनी वेगळे वळण दिले आहे. पाटील यांनी मागणी केली आहे की, जर दोन्ही पक्षांचा वाद मिटत नसेल, तर हे पद भाजपकडे सोपवावे. यामुळे आता रायगडच्या पालक मंत्रिपदाचा वाद आणखी तापण्याची शक्यता आहे. पालकमंत्रिपदाचा वाद नेमका काय आहे? 18 जानेवारी 2025 रोजी राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यात रायगडच्या पालकमंत्री पदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्री पदी भाजपचे गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, रायगड साठी शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आणि नाशिकसाठी दादा भुसे इच्छुक होते. त्यामुळे दोन्ही गटांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर अवघ्या एका दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालक मंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. तेव्हापासून हे दोन्ही जिल्ह्यांमधील पद रिक्त आहे. या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्था आणि 'महादेवी हत्तीणी' सारख्या इतर मुद्द्यांवरही चर्चा केली. शहा यांनी महादेवी हत्तिणीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतली. शिंदे-तटकरे भेटीत पालकमंत्रिपदाबाबत चर्चा नाही- आदिती तटकरे पालकमंत्री पदाबाबत योग्य वेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, तसेच विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, याची तिन्ही महायुती नेते काळजी घेतील, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची दिल्लीत सदिच्छा भेट झाली होती. मात्र, त्या भेटीत पालकमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाल्याचा संबंध नसल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्व नाही- आदिती तटकरे आदिती तटकरे म्हणाल्या की, पालकमंत्री पद ही एक मोठी अडचण नाही. काही अडचणी असल्या तरी त्यावर चर्चा व्हायला हवी. वरिष्ठ नेते यावर जेव्हा योग्य समजतील, तेव्हा निर्णय घेतील. पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्व नाही – तो फक्त एक भाग आहे. मी सध्या महायुती सरकारचा एक भाग म्हणून काम करत आहे.

What's Your Reaction?






