उद्रेक:पावसाळ्यातही केडगावकरांची एक एक थेंब पाण्यासाठी धावपळ, केडगावातील महिलांनी मनपात ठिय्या देत केली जोरदार घोषणाबाजी
मनपा अधिकारी एसी ऑफिसमध्ये बसून निर्णय घेतात, पण आम्हाला रोज सकाळी एक एक थेंब पाण्यासाठी धावपळ करावी लागते. स्वच्छता मोहिमा फक्त कागदावर चालतात, प्रत्यक्षात गल्लीबोळांत दुर्गंधी आणि साचलेला कचरा यामुळे जीवन असह्य झाले आहे. आमच्या मुलांचं आरोग्य धोक्यात आले आहे. जर प्रशासनाला नागरिकांच्या समस्या खरंच महत्वाच्या वाटत असतील, तर त्यांनी तात्काळ कृती करावी, अशा शब्दांत आपला संताप केडगावातील महिलांनी व्यक्त केला. केडगाव प्रभाग क्रमांक १७ मधील उपनगरीय भागातील नागरिकांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात सातत्याने पाणीटंचाई आणि अनियमित कचरा संकलनामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाला यापूर्वी निवेदन देऊनही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे महिलांनी बुधवारी हंडा घेऊन थेट पालिकेवर मोर्चा नेला. या वेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महिलांनी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. "पाणी आमचा हक्क आहे', "महापालिका झोपलीये', "कचऱ्याचा नाय नाय!' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आंदोलनाला प्रतिसाद मिळाला आणि महिलांचा सहभाग विशेषत्वाने लक्षणीय होता. या आंदोलनाचे नेतृत्व महेश सरोदे आणि श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टने केले. सरोदे यांनी म्हणाले, महिनोंमहिने सहन करून आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन दिले, वेळ दिला, पण प्रशासनाने केवळ आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही. आम्हाला सहा ते आठ दिवसांनी पाणी मिळतं आणि तेही इतक्या कमी दाबाने की पाण्याचा उपयोग होण्याआधीच तो संपतो. दुसरीकडे कचरा संकलनाची स्थिती अजून बिकट आहे. १०-१५ दिवसांनी कचरागाडी येते आणि रस्त्यावर कुजणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आमचं घरं शुद्ध ठेवायचं, मुलांना रोगराईपासून वाचवायचं, पण प्रशासन काहीही करत नाही. यामुळेच आम्ही आज महिलांसह रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही आंदोलन करण्याची हौस नाही, पण न्यायासाठी लढा द्यावा लागतोय. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रशासनाने जागे होऊन पाणी व कचऱ्याच्या समस्येवर ठोस पावले उचलावी. या आंदोलनात अनिता दाते, सोनाली बोरुडे, सविता हुलगे, आरती सरोदे, अलका कोतकर, सीमा हुलगे यांसह अनेक महिला सहभागी झाल्या. फक्त आश्वासन नव्हे, तर कृती हवी महापालिकेच्या प्रतिनिधींनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी पालिकेच्या वतीने सांगण्यात आले की, कचरा संकलनाचे टेंडर अद्याप प्रक्रियेत असल्याने त्यात थोडा वेळ लागणार आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची समस्या तात्काळ सोडवली जाईल, असा शब्द देण्यात आला. मात्र आंदोलकांनी फक्त आश्वासन नव्हे, तर कृती हवी असल्याचा ठाम पवित्रा घेतला.

What's Your Reaction?






