पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश:चाकण परिसरात अतिक्रमणे हटवल्यानंतर तातडीने रस्ते विकसित करा
वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडी आणि चाकण परिसरातील अतिक्रमणे हटवल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चाकण एमआयडीसी आणि परिसरातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे व्यावसायिक, कामगार आणि वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भागात अतिक्रमणधारकांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. पालकमंत्र्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते विकसित न झाल्यास पुन्हा अतिक्रमण वाढते. चाकण परिसरात अवजड वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशा वाहनांवर ठराविक वेळेची बंधने घालून एमआयडीसी भागात ट्रॅक टर्मिनल सुरू करण्याचेही सूचित करण्यात आले. पालकमंत्री अजित पवार यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आरटीओ आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करण्याचे निर्देश दिले. कचऱ्याची समस्या निकाली काढून अतिक्रमणे तातडीने हटवावीत असेही त्यांनी सांगितले. रस्ते विकसित करताना कोणी चुकीची भूमिका घेत असल्यास त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना, त्याचे कालबद्ध टप्पे आणि मास्टर प्लॅनचे सादरीकरण केले.

What's Your Reaction?






