कोटा मिळताच छत्रपती संभाजीनगर ते मुंबईसाठी स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस:रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदारांच्या शिष्टमंडळाला आश्वासन
वंदे भारतचा विस्तार नांदेडपर्यंत झाला आहे. ही रेल्वे २६ आॅगस्टपासून धावणार आहे. परंतु संभाजीनगरकरांची रेल्वे पळवल्याचा आरोप होत होता. मात्र आता छत्रपती संभाजीनगर ते मुंबईसाठी स्वतंत्र नवीन एक्स्प्रेस ऑक्टोबरपासून सुरू केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. डॉ. भागवत कराड यांच्या शिष्टमंडळास दिले. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी २१८९ कोटी रुपयांचा निधी केंद्राने दिला. यानंतर शुक्रवारी (१ आॅगस्ट) मराठवाड्यासह विदर्भातील खासदारांच्या शिष्टमंडळाने वैष्णव यांची भेट घेतली. या वेळी खा. कराड यांनी स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसची छत्रपती संभाजीनगर नागरिकांची सोय लक्षात घेत सुरू करण्याचे निवेदन वैष्णव यांना दिले. तेव्हा वैष्णव यांनी वंदे भारत एक्स्प्रेससाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील रेकचा कोटा उपलब्ध होत असल्याचे सांगितले. रेक उपलब्ध होताच छत्रपती संभाजीनगर ते मुंबई नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाईल, असे आश्वासन मंत्री वैष्णव यांनी दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. आधीची ट्रेन पळवल्याने गैरसोय वंदे भारतचा विस्तार नांदेडपर्यंत केला आहे. वेळेत बदल केल्याने संबंधित रेल्वे दुपारी अडीच वाजता मुंबईत पोहोचते. यामुळे उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांची मोठी अडचण होते. दरम्यान, आता नवीन वंदे भारत देण्याचे आश्वासन मिळाल्याचे खा. डाॅ. कराड यांनी सांगितले. खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे, खा. बळवंत वानखेडे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

What's Your Reaction?






