वडनेरभैरव विद्यालयात आठवणींना उजाळा:विद्यालयातील दहावीच्या 1985-1986 बॅचचे विद्यार्थी 39 वर्षांनी एकत्र
येथील जनता विद्यालयातील १९८५-१९८६ या वर्षातील बॅचचा स्नेहसंमेलन ३९ वर्षांनंतर पार पडले. या स्नेहसंमेलनास ८५ विद्यार्थी, १० शिक्षक व २ शिपाई उपस्थित होते. शाळेची घंटा वाजली अन् सर्व विद्यार्थी रांगेत उभे राहिले. ‘खरा तो एकचि धर्म’ ही प्रार्थना म्हटली गेली. दिवसभर वेगवेगळे खेळ खेळल्यानंतर ‘तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना’ हे गाणे लावले गेले. आपसूकच साऱ्यांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश खानापुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक मुकेश वाघ यांनी केले. जनता विद्यालयाच्या दगडी इमारतीपुढे विद्यार्थ्यांनी लावलेले रोपे, वर्ग आणि बेंचेस, जुन्या फोटोंना उजाळा देण्यात आला. प्रत्येकाने आपली ओळख व आठवणी सांगितल्या. अनेकांच्या डोळ्यांतून आपसूकच आठवणीचा बांध फुटला. जे वर्गमित्र स्वर्गवासी झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुढे बसणाऱ्या विद्यार्थांच्या खोड्या, मागच्या बाकावरील विद्यार्थांच्या खोड्या, एकमेकांच्या डब्यातील पदार्थ वाटून घेण्याची पद्धत या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर मान्यवर गुरुजनांचे सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. मालसाने सर यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी प्रत्येकाच्या मनात आजूनही आदर टिकून असल्याची भावना प्रामाणिकपणे व्यक्त झाली. सायंकाळी सर्वांचा निरोप घेण्यापूर्वी समूह छायाचित्र काढण्यात आले.

What's Your Reaction?






