कोथरूडमध्ये दलित तरुणींचा पोलिसांकडून छळ:गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ; प्रकाश आंबेडकर संतापले, पोलिसांना फोनवर जाब विचारला
कोथरूड पोलिस ठाण्यात तिन्ही दलित तरुणींवर पोलिसांकडून कथित छळ केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघड झाली आहे. या प्रकरणात तब्बल 24 तास उलटल्यानंतरही पुणे पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परिणामी, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला फोन करून निर्वाणीचा इशारा दिला. पुण्यातील या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्रीपासून आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आणि सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलिस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, मात्र एफआयआर नोंदवण्यात आला नाही. यानंतर संतप्त झालेल्या प्रकाश आंबेडकर यांनी कदम नावाच्या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावून याबद्दल जाब विचारला. आंबेडकरांनी फोनवर पोलिस अधिकाऱ्याला खडसावले प्रकाश आंबेडकर यांनी कदम नावाच्या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला. मात्र, एक-दोन दिवसांत एफआयआर दाखल करुन घेऊ, असे तो अधिकारी सांगत होता. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, एक लक्षात घ्या कदम.... ती मुलगी 25 वर्षांची आहे. कुठलातरी पोलिस औरंगाबादमधून येतो आणि हे सगळ्या कोणाच्यातरी घरात घुसतात. हे पोलिस कोणत्या कायद्याखाली मुलींच्या घरात घुसतात? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. पोलिसांना कोणाच्या घरात घुसण्याचा परवाना दिलेला नाही ना? त्यामुळे तुम्ही याप्रकरणात मुलींच्या तक्रारीनुसार, एफआयआर नोंदवून घ्या आणि मग त्याचा तपास करा, अशा शब्दांत त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला खडसावले. त्यावर पोलिस अधिकाऱ्याने दोन दिवस थांबा, अशी विनंती करताच संतप्त झालेल्या प्रकार आंबेडकरांनी 'दोन दिवस नाही ताबडतोब एफआयआर झाली पाहिजे. नाहीतर मी त्यांना सांगतो, धरणे देऊन बसा. कायदा हा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. चौकशी होत राहील, त्यामधून सत्य समोर येईल. पण एफआयआर नोंदवायला पोलिसांचा इतका विरोध का? तुम्ही एफआयआर नोंदवत नसाल तर सुप्रीम कोर्टाला पत्र पाठवू का, अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. पोलिसांचे मुलींना पत्र, गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता या मुलींना अवघ्या चार ओळींचे पत्र देत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. मुलींनी ज्याबाबत तक्रार केली आहे, ती घटना एका खोलीत घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढललेले नाही. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. नेमके प्रकरण काय? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिच्या मदतीला तत्काळ धाव घेत, पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं आणि स्वावलंबनासाठी आवश्यक अशा कौशल्यविकास प्रशिक्षणाचीही सोय केली. मात्र, या पीडित महिलेच्या नातेवाईकांमध्ये एकजण निवृत्त पोलिस अधिकारी असून, त्यांच्या दबावाखाली पुणे पोलिसांनी कोणतीही कायदेशीर नोटीस, समन्स किंवा वॉरंट न दाखवता कोथरूडमधील या तीन सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांना जबरदस्तीने पोलिस ठाण्यात नेले. या तिन्ही कार्यकर्त्या महिलांनी आरोप केला आहे की, कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये त्यांना एका वेगळ्या खोलीत नेऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच अत्यंत खालच्या पातळीवरचे आणि अपमानास्पद प्रश्न विचारले. सहायक पोलिस निरीक्षक (API) प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे PSI अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी पीडित महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात गेली असता, पोलिसांनी त्यांची नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही या महिलांनी केला आहे.

What's Your Reaction?






