पात्र व गरजू नागरिकांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा- आमदार काळे
कोपरगाव जनता करातून शासनाची तिजोरी भरते. या कराच्या माध्यमातूनच प्रशासकीय यंत्रणेचा खर्च भागवला जातो. त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने ही जाणीव ठेवून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी पार पाडावी. प्रशासन आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी पारदर्शक आणि तत्पर सेवा आवश्यक आहे. आपला समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांचा संपर्क असतो.त्यामुळे कुणाची परिस्थिती कशी आहे व कुणाला जास्त गरज आहे याची आपणास जाणीव असते.त्यामुळे पात्र व गरजू नागरिकांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. महसूल दिनानिमित्त तहसील कार्यालय कोपरगाव येथे आयोजित महसूल साप्ताहाचे उद्घाटन आ. काळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ जास्तीत पात्र गरजू नागरिकांना मिळावा यासाठी माझे सातत्याने प्रयत्न असतात. या सप्ताहा दरम्यान महसूल विभागाकडून दिल्या जाणार्या सेवा आणि राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. गरजू पात्र नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देता येईल यासाठी प्रयत्न करावा. नागरिकांत शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल अतूट विश्वास निर्माण करा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले.यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आ. काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, भूमी अभिलेख विभागाचे रमाकांत डाहोरे, दुय्यम निबंधक पोपट कुसळकर, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, मनिषा कुलकर्णी आदींसह मंडलअधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. महसूल सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. आशुतोष काळे.

What's Your Reaction?






