गणेशोत्सवाची तयारी:‘माधुरी हत्तीणी’वर आधारित बाप्पांना पसंती, गणेशमूर्ती निर्मितीला वेग, अहिल्यानगरच्या गणेशमूर्तींना देशभरातून मागणी
काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये गणेशमूर्ती निर्मितीला वेग आला आहे. लहान मूर्तींपासून ते अतिभव्य मूर्तींपर्यंत प्रत्येक स्वरूपातील गणपती मूर्ती तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अहिल्यानगर परिसरातील विविध मूर्ती निर्मिती कारखान्यांमध्ये मूर्तिकार आणि कुशल कारागीर अहोरात्र परिश्रम घेत आहेत. अहिल्यानगरच्या गणेशमूर्तींना देशभरातून मोठी मागणी आहे. यंदा कोल्हापूर मध्ये चर्चेत असलेल्या ‘माधुरी हत्तीणी’वर आधारित मूर्तींना विशेष पसंती मिळत आहे. या मूर्तींत गजाननाचे हत्तीणीवर बसलेले स्वरूप भाविकांच्या मनाला भिडत आहे. तसेच पारंपरिक स्वरूपातही लालबागचा राजा, चिंतामणी, लंबोदर, सिद्धिविनायक यांसारख्या प्रसिद्ध मूर्तींच्या प्रतिकृतींचीही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. प्रत्येक मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात दडलेले भाव, भक्तिभाव आणि श्रद्धेचे दर्शन. गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवर बंदीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कायदेशीर वादामुळे मूर्तिकार आणि कारखानदारांना सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. पर्यावरणपूरक मूर्तींसाठी शासनाने नवे निकष लागू केल्यामुळे अनेक कारखान्यांचे काम थांबले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मूर्तिकारांना दिलासा मिळाला. परिणामी, गणेशोत्सव जवळ आलेला असतानाही मूर्तिकारांनी आशावादाने पुन्हा कामाला वेग दिला असून मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. यंदा गणेशोत्सव लवकर आल्यामुळे मूर्ती निर्मितीसाठी असलेला वेळ मर्यादित राहिला आहे. त्यातच मागील गोंधळामुळे सुरुवातही उशिरा झाली. त्यामुळे आता कारागीरांनी रात्रंदिवस एकच ध्यास घेतला आहे. मूर्तींच्या रंगरंगोटीपासून ते नक्षीकामापर्यंतची कामे सुरू आहेत. एका मूर्तीच्या मागे अनेक तासांचे कौशल्य आणि परिश्रम गुंतलेले असतात. मूर्तीकलेतील बारकावे, चेहऱ्यावरील भाव, शरीराची डौलदार मांडणी, सजावट यासाठी कलाकारांचे सामूहिक काम सुरू आहे. नगर शहरातील गणेश मूर्ती कारखाने मूर्ती निर्मिती क्षेत्रात नावाजलेले आहेत. अनेक वर्षे देशभरातील गणेशभक्तांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. या कारखान्यांतून तयार होणाऱ्या मूर्तींना केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, असे मूर्तीकार प्रफुल लाटणे यांनी सांगितले. शहरातील कारखान्यांमध्ये विशेष बाब म्हणजे येथे महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मूर्ती निर्मितीच्या विविध टप्प्यांमध्ये - जसे की रंगकाम, अलंकार सजावट, नक्षीकाम, थर देणे - या सर्व प्रक्रियांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. पुरुषांप्रमाणेच त्या खांद्याला खांदा लावून काम करत असून त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य दोन्ही लक्षणीय आहे. मूर्तिकारांची कला, संस्कृतीचा वारसा जपला जातोय गणेश मूर्ती निर्माण करताना कारागीर आणि मूर्ती यांच्यात एक भावनिक नाते निर्माण होते. कलाकार जेव्हा एका मातीच्या गोळ्याला हळूहळू सजीव रूप देतो, तेव्हा तो केवळ एक वस्तू घडवत नाही, तर श्रद्धेचा एक केंद्रबिंदू घडवत असतो. मूर्ती घडवण्याच्या या प्रक्रियेत एक विलक्षण ऊर्जा, एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं, जे पाहणाऱ्याला सुद्धा भारावून टाकते. गणेशोत्सव साजरा करताना घराघरात विराजमान होणार्या गणपतीमागे अशा कारागीरांची मेहनत, समर्पण आणि भावनिक नाळ दडलेली असते. त्यांचा हा संघर्ष आणि कलेवरील प्रेम या उत्सवात जीव ओततात. त्यामुळे अहिल्यानगर सारख्या ठिकाणीही आज भारतभर प्रसिद्धी मिळालेल्या मूर्तिकारांची कला आणि संस्कृतीचा वारसा जपत ठेवला जात आहे.

What's Your Reaction?






