पत्नीचा दावा पुराव्यांअभावी फेटाळला:पती शारीरिक संबंधात असमर्थ असल्याचा आरोप सिद्ध न झाल्याने कौटुंबिक न्यायालयाचे दोन महिन्यांत संसार थाटण्याचे आदेश
पुणे कौटुंबिक न्यायालयाने पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा आरोप करणाऱ्या पत्नीला मोठा धक्का दिला आहे. न्यायाधीश घुले यांनी पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी फेटाळून तिला दोन महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याचा आदेश दिला आहे. सुनील आणि स्मिता (नावे बदलली आहेत) यांचा विवाह २०२१ मध्ये झाला होता. काही काळानंतर स्मिता पतीचे घर सोडून गेल्या. त्यामुळे सुनील यांनी हिंदू विवाह अधिनियमांतर्गत वैवाहिक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. पतीच्या याचिकेला उत्तर देताना स्मिता यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की पती संशयी स्वभावाचा असून शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. लग्नानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत. पतीचे शरीर संबंधापूर्वीच वीर्यस्खलन होत असे, असेही तिने जबाबात म्हटले. याउलट, पतीने आपल्या याचिकेत हे सर्व आरोप फेटाळले. तो शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असून मधुचंद्रावेळी आणि त्यानंतरही त्यांच्यात आनंदी शारीरिक संबंध होते, असे पतीने सांगितले. याचिकाकर्ते पतीची बाजू ॲड. मयूर साळुंके, ॲड. अजिंक्य साळुंके, ॲड. अमोल खोब्रागडे आणि ॲड. पल्लवी साळुंके यांनी मांडली. ॲड. अजिंक्य साळुंके म्हणाले की हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह हा पवित्र संस्कार आहे. किरकोळ कारणे किंवा सिद्ध न झालेले आरोप यावरून ही संस्था मोडता कामा नये. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे तपासले. पत्नीने पतीच्या शारीरिक क्षमतेवर आरोप केला असला तरी कोणताही वैद्यकीय पुरावा दिला नाही. तिच्या म्हणण्यात विसंगती आढळली. एकीकडे शारीरिक संबंध झालेच नाहीत असे सांगितले, तर दुसरीकडे पतीचे लवकर वीर्यस्खलन व्हायचे असे सांगणे यातून तिच्या दाव्यावर संशय निर्माण होतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ आरोप करणे आणि ते कायदेशीररीत्या सिद्ध करणे या दोन भिन्न बाबी आहेत. त्यामुळे पत्नीला दोन महिन्यांच्या आत पतीसोबत संसार थाटण्याचे आदेश दिले आहेत.

What's Your Reaction?






