पारदर्शकतेची कास धरा:महसूल विभागाने लोकाभिमुख, गतिमान पद्धतीने कामे करावीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येत असून महसूल विभागाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने विकासकामे वेळेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्तालय येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, बापुसाहेब पठारे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देवून पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून महसूल विभाग हा महत्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहे. अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल विभाग नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत असतो. इतर विभागांनाही सोबत घेवून लोककल्याणकारी योजना, ध्येयधोरणे, उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावी करण्यासोबतच प्रशासकीय गतिमानता आण्याकरिता महसूल विभागाने काम करावे. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने आणि इतर सर्व सबंधित विभागाने उत्तम कामे करुन संकटाशी सामना केला, यांची नोंद नागरिकांनी घेतलेली आहे, असेही ते म्हणाले. राज्यशासनाच्या वतीने नागरिकांना पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे. गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत महसूल विभागाशी नागरिकांशी दैनंदिन संबंध येत असतो. त्यामुळे आपण कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता नागरिकांना गुणवत्तापूर्ण, पारदर्शक सेवा द्यावी, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक द्यावी. चांगले काम करून महसूल विभागासह राज्य शासनाप्रती नागरिकाच्या मनात उंचविण्याचे काम केले पाहिजे. आगामी काळात नागरिकांना अधिकाधिक ऑनलाईन सेवा देण्यावर भर देण्यात येणार येणार असून नागरिकांनाही या सेवांचा लाभ घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करून यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत. महसूल सप्ताहामध्ये सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले कामे करावे. राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसाचा कृती कार्यक्रम राबवण्यात आला, आता १५० दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात येत आहे, यामध्ये उत्सूर्फपणे सहभाग होवून कामे करावीत, असेही पवार म्हणाले. शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा महसूल विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाइन झाल्या आहेत, नागरिकांना या सेवांचा प्रभावीपणे, पारदर्शकरीत्या लाभ देण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात ई-प्रणाली, एआयचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. आपल्या पदाचा लोककल्याणाकरिता उपयोग झाला पाहिजे, अशी भावना ठेवून जबाबदारी पूर्वक कामे केली पाहिजे. नागरिकांची कामे कायद्याच्या चौकटीत बसवून ही कामे वेळेत होवून त्यांचा वेळ व खर्च वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामांचे अनुकरण करावे राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम राबविल्याबद्दल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे, इतरांनी त्यांच्या कामाचे अनुकरण करुन आपल्या दैनंदिन कामकाजात समावेश केला पाहिजे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कपणे उभे राहिले पाहिजे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी करण्याकरिता संबंधित विभागाचे मंत्री, सचिवांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

What's Your Reaction?






