जेथे मंत्रीच खेळतात रमी, तेथे कायदा-सुव्यवस्थेची काय हमी?:युवक काँग्रेसचे सीपींना साकडे, गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन
मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतील रमी खेळतानाचा व्हिडीओ, शहरात वाढलेले खून, चोऱ्या व गुंडगिरीचे प्रकार या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने बुधवारी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांना साकडे घातले. शहरातील कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जावीत, अशी मागणी यावेळी केली . दरम्यान आयुक्तांना भेटण्यापूर्वी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘मंत्रीच खेळतात रमी, तेथे कायदा-सुव्यवस्थेची काय हमी ?’ अशा प्रश्नरुपी घोषणा देत या आंदोलनाकडे लक्ष वेधले. त्यांच्या निरीक्षणानुसार महिन्याभरात शहरात गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ झाली आहे. एमडी ड्रग्ज, गांजा व चायना चाकू यांची विक्री शहरात सुरू आहे. अवैध जुगार अड्ड्यांची संख्याही वाढली आहे. एकंदरीत अवैध धंद्यांनी हातपाय पसरले आहेत. याचा सामाजिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होत आहे. शहरातील अनेक बार वा पबमध्ये मध्यरात्री उशीरापर्यंत पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. शहरात काही ठिकाणी अल्पवयीन मुलांना दारू विकली जात आहे. यावर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले. हे शहर क्राईम कॅपिटल म्हणून उदयास येत असल्याची भावना एका आमदारांनी विधान भवनात बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे शांतता, सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. अशा या सगळ्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाचे अस्तित्व दिसत नसल्याची भावना नागरिकांत आहे, हेही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी समीर जवंजाळ, वैभव देशमुख, सागर कलाने, अनिकेत ढेंगळे, आशिष यादव, संकेत साहू, मोहीत भेंडे, धनंजय बोबडे, कौस्तुभ देशमुख, संकेत भेंडे, शुभम बांबल, कृणाल गावंडे, पियुष अभ्यंकर, चैतन्य गायकवाड, श्रेयस धर्माळे, वेदांत केने, अमेय देशमुख, आकाश गेडाम, कुणाल जोध आदी उपस्थित होते. पोलिसही सुरक्षित नाहीत गेल्या महिन्याभरात दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्या झाल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरसुद्धा यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. विशेष असे की याच मुद्द्याला धरुन खासदार बळवंतराव वानखडे व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख आदींच्या नेतृत्वात प्रतिनिधीमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. दरम्यान विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार संजय खोडके यांनीही हा मुद्दा सभागृहात लाऊन धरला होता.

What's Your Reaction?






