बहिणाईंचे विचार आजही भक्तांसाठी मार्गदर्शक:तलवाडा येथील हरिनाम सप्ताहात संजय महाराज पाचपोर यांचा हितोपदेश
प्रतिनिधी | लोणी खुर्द संत बहिणाबाईंचा सप्ताह साजरा होणे ही केवळ परंपरेची पुनस्मृती नसून, तो भक्तीचा आणि संस्कृतीचा खरा सुगंध आहे, असे प्रतिपादन संजय महाराज पाचपोर यांनी केला. वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे सुरु असलेला संत बहिणाबाई अखंड हरिनाम सप्ताहात संजय महाराज पाचपोर यांचे कीर्तन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मधुसूधन महाराज, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, भाऊसाहेब चिकटगावकर, बाबासाहेब जगताप, प्रशांत सदाफळ, पारस घाटे, भागीनाथ मगर, राजेंद्र मगर, राजेंद्र निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती. पाचपोर महाराज म्हणाले, ‘‘या सप्ताहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, ४०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या संत बहिणाबाईंचा संदेश आजही तितकाच ताजा व प्रेरणादायी आहे. बहिणाबाई ही एक अद्वितीय संत कवयित्री असून त्यांनी आपल्या अनुभवातून आणि समर्पणातून जे विचार मांडले, ते आजही प्रत्येक भक्तांसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांचा गंध भक्तीचा आहे आणि तो आजही दरवळतोय, सप्ताहात दररोज हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक नामवंत कीर्तनकार, महिला प्रवक्त्या, वादक आणि सेवेकऱ्यांनी या सप्ताहाची शोभा वाढवली.’’ वारकरी संप्रदाय ही केवळ धार्मिक चळवळ नाही, तर ती आत्म्याचा खरा शोध घेणारी आध्यात्मिक चळवळ आहे. याची उंची कुणीही मोजू शकत नाही. ती अनुभूतीची गोष्ट आहे, असेही महाराज यावेळी म्हणाले.

What's Your Reaction?






