जैसलमेर राजघराण्याचा मराठा साम्राज्यावर आक्षेप:NCERT च्या नकाशात दिशाभूल, पूर्वजांच्या बलिदानाचा अवमान झाल्याचा आरोप
जैसलमेरच्या राजघराण्याने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या पुस्तकात छापलेल्या मराठा साम्राज्याच्या नकाशावर तीव्र आक्षेप घेतला आहे. या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आले असून, ही बाब इतिहासाविषयी दिशाभूल करणारी, तथ्यहीन व आक्षेपार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जैसलमेर राजघराण्याचे वंशज चैतन्य राज सिंह यांनी याविषयी सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मराठा साम्राज्याच्या नकाशावर तीव्र हरकत घेतली आहे. ते म्हणतात, एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या सामाजिक विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकात (घटक 3, पृष्ठ क्रमांक 71) एक नकाशा आहे. या नकाशात जैसलमेर हे मराठा साम्राज्याचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही बाब इतिहासाची दिशाभूल करणारी असून, तथ्यहीन व गंभीर आक्षेपार्ह आहे. अशा प्रकारची असत्यापित व ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव असणारी माहिती केवळ एनसीईआरटी सारख्या संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, तर आपल्या गौरवशाली इतिहासाला व जनभावनांनाही दुखावते. हा मुद्दा केवळ पाठ्यपुस्तकातील चूक वाटत नाही, तर आमच्या पूर्वजांच्या बलिदानाला, सार्वभौमत्वाला व शौर्याला कलंकित करण्याचा एक प्रयत्न वाटत आहे. जैसलमेर संस्थानाच्या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या प्रामाणिक ऐतिहासिक स्त्रोतांमध्ये कुठेही मराठ्यांचे वर्चस्व, आक्रमण, कर आकारणी किंवा प्रभुत्व यांचा उल्लेख आढळत नाही. उलट, आपल्या राजकीय (सरकारी) पुस्तकांतही स्पष्टपणे नमूद केले आहे की, मराठ्यांनी जैसलमेर संस्थानात केव्हाही कोणताही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या ज्वलंत मुद्याकडे लक्ष द्यावे. मी संपूर्ण जैसलमेरच्या वतीने त्यांना विनंती करतो की, त्यांनी हा गंभीरपणे घेओऊन एनसीईआरटीने केलेली चूक दुरुस्त करावी. कारण, ही चूक हेतुपुरस्सर, पूर्वग्रहदूषित व एक संभाव्य अजेंडा असल्याचे दिसून येत आहे. ही केवळ एक तथ्य सुधारणा नाही तर आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठेशी, स्वाभिमानाशी आणि राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अखंडतेशी संबंधित बाब आहे. या मुद्द्यावर जलद आणि ठोस कारवाई अपेक्षित आहे, असे चैतन्य राज सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अकबर सहिष्णू, औरंगजेब मंदिरे पाडणारा उल्लेखनीय बाब म्हणजे एनसीईआरटीच्या पुस्तकांविषयी वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापू्र्वी आठवीच्याच सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात बाबर क्रूर राजा, अकबर सहिष्णू, तर औरंगजेब हा मंदिरे पाडणारा बादशहा असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यावरही मोठा वाद निर्माण झाला होता. एनसीईआरटीने या प्रकरणी पुस्तकात भूतकाळातील घटनांसाठी आज कुणालाही दोषी ठरवू नये अशी मखलाशीही मारली होती. हे ही वाचा... एकनाथ शिंदे पुन्हा राजधानी दिल्लीत:पीएम नरेंद्र मोदी, अमित शहांची घेणार भेट; उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीत तळ ठोकून, घडामोडींना वेग नवी दिल्ली - सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. ते गत आठवड्यातच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी पुन्हा दिल्ली गाठली आहे. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर असताना शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे याविषयी राज्याच्य राजकारणात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. वाचा सविस्तर

What's Your Reaction?






