कबुतरखाना प्रकरण:धर्माविरोधात जाल तर हाती शस्त्रही घेऊ कोर्टालाही मानणार नाही - जैनमुनी नीलेशचंद्र विजय; 13 ऑगस्टपासून उपोषण
मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला आहे. कबुतरखाने सुरू ठेवण्यासाठी १३ ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहोत. वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही, असा इशारा जैनमुनी नीलेशचंद्र विजय यांनी दिला आहे. कबुतरांना दाणे न टाकण्याचा न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाला आहे. यासंदर्भात बोलताना जैनमुनी नीलेशचंद्र विजय म्हणाले, आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. शस्त्र उचलणे हा आमचा स्वभाव नाही, पण धर्माविरोधात पाऊल उचलले गेले तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही भारताचे संविधान, कोर्ट आणि सरकारला मानतो, परंतु आमच्या धार्मिक तत्त्वांवर गदा आणली तर आम्ही कोणालाही मानणार नाही. ‘मी एकटा नाही, देशातील १० लाख जैन उपोषण करतील’ जैनमुनी म्हणाले, १३ ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मी एकटा आंदोलनाला बसणार नाही. देशभरातील १० लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील. गरज पडल्यास शांतताप्रिय समाज असतानाही आम्ही धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही. कोर्टाच्या आदेशालाही आम्ही जुमानणार नाही. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून ६८ हजारांचा दंड वसूल मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी असतानाही काही लोक त्याचे उल्लंघन करत आहेत. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलत अशा व्यक्तींवर कडक कारवाई सुरू केली असून दंड आकारण्यात येत आहे. १३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत पालिकेने १४२ प्रकरणे नोंदवली असून एकूण ६८ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक दंड हा चर्चेत असलेल्या दादर पश्चिम भागातील कबुतरखाना येथून गोळा करण्यात आला आहे. या ठिकाणी ५१ व्यक्तींकडून २२ हजार २०० रुपये दंड वसूल झाला आहे. संदीप देशपांडेंचा टी-शर्ट अन् परप्रांतीयांना गर्भित इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेला टी-शर्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा टी-शर्ट घालून ते दादर परिसरात फिरताना दिसले. त्यांनी घातलेल्या या टी-शर्टवर “नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं’ असा मजकूर लिहिलेला होता. हा संदेश म्हणजे मुंबईत राहूनही कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्ष इशारा असल्याचे बोलले जात आहे.

What's Your Reaction?






